Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’ ही महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जांची सध्या तपासणी सुरू असून, शासनाने यामध्ये काही नवीन आणि कठोर अटी लागू केल्या आहेत. या नियमांमुळे अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, ज्या महिलांनी अर्जात चुकीची माहिती दिली आहे किंवा ज्या योजनेच्या मूळ निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांना पुढील लाभापासून वंचित राहावे लागेल.
लागू झालेल्या नवीन अटी आणि नियम
- वयाचा निकष: नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज करणाऱ्या महिलांचे वय १ जुलै २०२४ रोजी २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे, तर वेब पोर्टलवरून अर्ज करणाऱ्या महिलांसाठी हे वय ३० सप्टेंबर २०२४ रोजी २१ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे.
- वयाची पडताळणी: अर्ज करताना सादर केलेल्या आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांवरील जन्मतारीख समान असणे आवश्यक आहे. यात फरक आढळल्यास अर्ज बाद ठरवला जाईल.
- ६५ वर्षांपेक्षा जास्त वय: १ ऑगस्ट २०२५ पर्यंत ज्या महिलांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असेल, त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
- शिधापत्रिकेवर (रेशन कार्ड) एकच लाभार्थी: एकाच शिधापत्रिकेवर फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेऊ शकते. जर एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला, उदा. सासू आणि सून, लाभ घेत असतील, तर त्यापैकी एकच पात्र ठरेल.
- एकाच कुटुंबातील दोन बहिणी: जर एकाच कुटुंबातील दोन बहिणींनी अर्ज केला असेल, तर त्यापैकी एक अर्ज अपात्र ठरवला जाईल.
- शिधापत्रिकेतील बदल: योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर शिधापत्रिकेत काही बदल केला असल्यास, जुने शिधापत्रिकाच ग्राह्य धरले जाईल.
- परप्रांतीय महिला: योजनेच्या नियमांनुसार, परप्रांतीय महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत स्थलांतरित लाभार्थ्यांची तपासणी केली जाईल, जेणेकरून योजनेचा गैरवापर टाळता येईल. त्यामुळे, तुम्ही या योजनेचे लाभार्थी असल्यास, वरील सर्व अटींचे पालन करत आहात की नाही, याची खात्री करून घ्या.