Ladki Bahin Yojana 2100 Rupees : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) अंतर्गत महिलांना सध्या दरमहा ₹१,५०० मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ही रक्कम ₹२,१०० पर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुका होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अद्याप ही वाढ लागू झालेली नाही. याबद्दल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
पैसे कधी वाढणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, योग्य वेळ आल्यावर योजनेतील पैसे वाढवले जातील. सध्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर ताण असल्याने ही वाढ लगेच लागू करणे शक्य झालेले नाही. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर ₹१,५०० च्या ऐवजी ₹२,१०० देण्याची घोषणा केली जाईल. त्यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांना आता या ‘योग्य वेळेची’ वाट पाहावी लागेल.
या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळत असून, विधानसभा निवडणुकीनंतर अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे. आता राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावरच हा वाढीव हप्ता मिळेल अशी अपेक्षा आहे.
 
		 
                     
                     
                    