नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा (PMFBY) पहिला हप्ता म्हणून ३,२०० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, उर्वरित ८,००० कोटी रुपयांचे वितरणही लवकरच केले जाईल.
पिक विम्याचा पहिला हप्ता जारी
हा पहिला हप्ता सुमारे ३० लाख शेतकऱ्यांसाठी असून, यामध्ये खरीप २०२२ पासून ते २०२४ पर्यंतच्या थकलेल्या नुकसानभरपाईचा समावेश आहे. कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरून ही घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाहीत, त्यांनी काळजी करू नये, लवकरच उर्वरित निधीही दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या रकमेचे वितरण राजस्थानमधील झुंझुनू येथे एका कार्यक्रमात करण्यात आले, ज्यात केंद्रीय कृषीमंत्री आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित होते.
विमा कंपन्यांना कठोर इशारा
यावेळी, कृषीमंत्र्यांनी विमा कंपन्यांना थेट इशारा दिला आहे. जर त्यांनी शेतकऱ्यांना ठरलेल्या वेळेत नुकसानभरपाई दिली नाही, तर त्यांना १२% व्याजासह दंड भरावा लागेल. हे व्याज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. या कठोर भूमिकेमुळे शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळण्याची खात्री झाली आहे.
पंतप्रधान पीक विमा योजना २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. गारपीट, पूर, दुष्काळ, किंवा अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्त्यांमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.